नुकतीच लागवड केलेली भात रोपे फस्त;
शेतकरी शांताराम मिराशी यांचे मोठे आर्थिक नुकसान
शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी सरमळेवाडी येथील त्रिपूर शेतात गवा रेड्याच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गवा रेड्याने शेतकरी शांताराम पांडुरंग मिराशी यांच्या भातशेतीत घुसून नुकतीच लागवड केलेली भाताची रोपे फस्त केली. तसेच उर्वरित भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
शांताराम मिराशी यांनी यंदा कमी पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही मोठा खर्च करून अथक परिश्रमांच्या जोरावर भाताची लागवड केली होती. मात्र, गवा रेड्याच्या एका रात्रीतील उपद्रवामुळे त्यांच्या परिश्रमांची एका रात्रीत माती झाली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षीही गवा रेड्याने त्यांच्या भातशेतीची मोठी नासधूस केली होती. दरवर्षी त्रिपूर शेतात गवा रेड्यांचा उपद्रव वाढत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या सततच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले असून काहींनी आपली शेती पडीत ठेवली आहे. परिणामी, परिसरातील शेती धोक्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी तसेच गवा रेड्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.











