अरुअप्पा जोशी प्रशिक्षण अकादमीच्या विद्यार्थिनींचे क्लार्क भरतीमध्ये यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीच्या विद्यार्थिनींनी एमपीएससी क्लार्क परीक्षेमध्ये नैपुण्य प्राप्त केले आहे. अकादमीच्या विद्यार्थिनी प्रज्ञा नार्वेकर आणि श्रद्धा दैत यांनी उत्तम गुण मिळवत क्लार्क भरती या परीक्षेत यश संपादन केले.

प्रज्ञा नार्वेकर यांनी अकादमीमध्ये फाऊंडेशन कोर्स केला होता. त्यानंतर त्यांनी अभ्यासिकेत येऊन स्वतःचा अभ्यास करण्यास सुरवात केली. गेले वर्षभर त्या अकादमीतील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन देखील करत आहेत. श्रद्धा दैत या देखील बऱ्याच काळापासून अकादमीमध्ये विविध परीक्षांचा अभ्यास करत होत्या. निरनिराळ्या परीक्षांमध्ये प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यानंतर होणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये समाधानकारक गुण न मिळाल्याने त्यांनी अभ्यासाचा सपाटा चालू ठेवला होता. अकादमीतील अभ्यासिकेत दररोज १०-१२ तास अभ्यास करून त्यामध्ये सातत्य ठेवत हे यश त्यांनी संपादन केले आहे.

अकादमीच्या मार्गदर्शकांकडून नेहमीच परीक्षेसाठी उपयुक्त माहिती मिळत गेल्याचे दोघींनी सांगितले. या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे व अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अकादमीतर्फे एमपीएससी इंटिग्रेटेड बॅच (८ महिने), फाऊंडेशन बॅच (४ महिने) आणि बँकिंग– इन्शुरन्स बॅच (४ महिने) तसेच पोलीस भरती याकरिता ऑक्टोबर महिन्यात कोर्स सुरू होणार आहेत. अकादमीची अभ्यासिका असून ती सकाळी ७ ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. यातही अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. रत्नागिरीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.