प्रकल्पांना विरोध करायला बाळासाहेब, दिघे साहेबांनी शिकवलं नाही
लोटे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदूस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीचे भुमीपुजन
खेड | प्रतिनिधी : ग्रीनफिल्ड हायवे व कोकण विकास प्राधिकरण निर्मितीला गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिंदूस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीचे भुमीपुजन गुरुवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. व्ही. यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांचा तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, आ.योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आ. योगेश कदम, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. रॉड्रिक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा व आनंदाचा आहे. आर्थिक भरभराटीसाठी उद्योगाची पावले कोकणात पडावीत वाढवीत अशी सरकारची भूमिका आहे. पर्यावरण संतुलन राखत औदयोगिकरण देखील महत्वाचे. रत्नागिरीच्या रत्नभूमित आपण आधुनिकतेची कास धरत आहोत. कंपनीचे मी स्वागत करतो. विविध प्रकारची उत्पादने देशभरात आहेत. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची सरकारची भूमिका आहे. कंपनीने देखील स्थानिक लोकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र उद्योग, व्यापार, गुंतवणूक संस्था सुरू करून आपण विकास प्रकल्पांना गती दिली आहे. हा प्रकल्प आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. कोकणाला विकासाकडे नेण्यासाठी पायाभूत सुविधा व उद्योग निर्मिती करावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन आहे. आम्ही उद्योग उभे राहतील यासाठी अनेक सुविधा कारखानदारांना करत आहोत. आम्ही तयार केलेल्या उद्योग धोरणाचे ८० टक्के अवलंब करण्यात आला आहे. औदयोगिक विकासासोबत विस्तारित समुद्र किनारी पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न साकार करू. कोकण विकास प्राधिकरणाच्या माध्यमातुन ६७ टीएमसी पाणी कोकणात खेळवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोका कोलाने जास्तीत जास्त कोकणात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जसे केंद्र सरकार शेतकऱ्याला बँक खात्यात ६ हजार देत आहे, तसे राज्य सरकार देखील ६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रकल्पांना विरोध करायला बाळासाहेब, दिघे साहेबांनी शिकवलं नाही
“केवळ निवडणुकीपुरते राजकारण करायचे आणि प्रकल्पांना विरोध करायला आम्हाला बाळासाहेब किंवा दिघे साहेब यांनी शिकवले नाही. ” अस वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राजापुरातील रिफायनरी बाबत उद्धव ठाकरे यांच्या भूमिका परस्परविरोधी होत्या, या संदर्भात हा टोला होता अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु होती.











