गुहागर l प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नवभारत वृत्त समूहाचे मराठी राष्ट्रीय दैनिक नवराष्ट्रच्यावतीने सरपंच जनार्दन आंबेकर यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांचा सन्मान रविवार दि.२४.१२.२०२३ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील “सावंत पॅलेस हाॅटेल” येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत ठराव मंजूर करून विधवा अनिष्ट प्रथा, पुर्वापार चालत आलेल्या कालबाह्य रूढी-परंपरा, बालविवाह आणि अंधश्रद्धा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी ग्रामपंचायत उमराठच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाड्यांत सुरू केलेली आहे. तसेच विधवा महिलांना धार्मिक कार्यात हळदीकुंकू देऊन सन्मान करण्याची प्रथा चालू केलेली आहे. अशा प्रकारे विधवांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल तसेच आईवडिलांना सांभाळत नाही तर मालमत्तेत वारस नोंद लावता येणार नाही, वडिलोपार्जित जमीनजागा शक्यतो विकू नका, परप्रांतीयांना तर नकोच नको असे आणखी धाडसी निर्णय ग्रामसभेत ठराव करून संमत करण्यात आले आहेत. शिवाय शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या अनेक सोयी – सुविधांचा, विकास कामांचा सुद्धा ग्रामस्थांना /लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत उमराठ सदैव अग्रेसर असते. अशा अनेक बाबींमुळे जनार्दन आंबेकर यांची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सदर नवराष्ट्र सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.












