More than 3 thousand crore funds to Sindhudurg district from the coalition government in the state
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मानले आभार
जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना
आगामी निवडणुकांमध्ये शंभर टक्के यश हे भाजपचे आगामी टार्गेट
सावंतवाडी | प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या सेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तब्बल २७८५.८० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून स्वदेश दर्शन प्रादेशिक पर्यटन व अन्य योजनांचा निधी मिळून ३ हजार कोटींपेक्षा जास्तचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला युती शासनाच्या काळात खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो असे सांगत या निधीतून होत असलेली कामे दर्जेदार व्हावीत यासाठी पालकमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई खात्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून विशेष ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आली आहेत. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातूनही प्रादेशिक पर्यटनमधून अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच स्वदेश दर्शन च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ५६५ कोटींची कामे मंजूर असून त्यातील काही कामांचे आपण स्वतः उद्घाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी ही योजना सुरू केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र व राज्य सरकारचे त्यांनी यावेळी आभार मानले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यभार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५१ कोटींची कामे मंजूर झाली असून त्यातून विविध रस्ते, पूल, साकव, इमारती तसेच बांधकाम विभाग अंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहे. तर पतन अंतर्गत बंधार्यांसाठी १०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चक्रीवादळ तसेच इतर वादळामुळे किनारपट्टीच्या गावामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवून त्या ठिकाणी विजेचे पोल व हीच वाहिन्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता एकूण ८०४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून महावितरणच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
तसेच जलसंपदा खाते हे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी ४३८ कोटींची तरतूद केली आहे. तर जलसंधारण खाते दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी ३०७ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती यावेळी राजन तेली यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेला हा सर्वात जास्त निधी असून आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंतवाडी तालुक्यात होऊ घातलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मार्गी लागावे यासाठी आपण मंत्री तानाजी सावंत भेट घेतली असून स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन सर्वमान्य अशी जागा निवडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्नही लवकरच मार्गी निघेल असेही राजन तेली म्हणाले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यात कोणीही श्रेय घेण्याचा विषय नाही. स्थानिक आमदारांनीही हा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे आंबोली गेळे येथील कबुलायतदार गांवकर प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर असून त्यासाठीही आपले प्रयत्न सुरू आहेत. आपण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत भेटून सविस्तर चर्चा केली आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना सोबत घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहनही आपण केले होते. या प्रश्नामुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामूळे आता हा विषय अंतिम टप्प्यात असून तो प्रश्नही लवकरच निकाली निघेल असे त्यांनी सांगितले.