सेवाभावी वृत्तीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून पारिजातची ओळख – विजय महाडेश्वर

 

विद्यामंदिर कुसबे येथे शैक्षणिक साहित्य वितरण

कुडाळ – सेवाभावी वृत्तीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून पारिजातने ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थी शिक्षणातून पुढे यावेत, या उद्देशाने पारिजात ( सुगंध जगण्यातला… ) मुंबई या सामाजिक, सांस्कृतिक व विशेषतः पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, यातूनच, देशाचे भावी सुजाण नागरिक घडतील असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय महाडेश्वर यांनी मोफत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून काढले. ते विद्यामंदिर कुसबे येथे पारिजात ( सुगंध जगण्यातला… ) मुंबई या संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सरपंच समिक्षा जाधव, शा. व्य. समिती अध्यक्ष, पूर्वा सावंत, उपाध्यक्ष भाग्यश्री गांवकर, केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर, मुख्याध्यापक आप्पासाहेब हरमलकर, शिक्षक गजेंद्र राणे, सुबोधिनी सावंत, वैशाली साठे, नारायण घाडीगांवकर, चैत्राली जाधव, अमृत महोत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र घाडीगांवकर, उपाध्यक्ष नितीन महाडेश्वर, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. पारिजात संस्थेकडून २३ शैक्षणिक साहित्य संच प्राप्त होते. परंतु, पटसंख्या वाढल्याने कोणीही विद्यार्थी शैक्षणिक साहित्य संचापासून वंचित राहू नये म्हणून, श्री. राजेंद्र घाडीगांवकर यांच्या सौजन्याने १००% विद्यार्थ्यांना साहित्य संच वितरण करण्यात आले.

पारिजात, मुंबई (सुगंध जगण्यातला…) संस्थेचे श्री चेतन पवार व रूचिरा मॅडम यांच्या संपर्कात राहून शैक्षणिक साहित्य मिळवण्यापासून ते ताब्यात घेणे व शाळेपर्यंत पोहोच करण्याची सर्वस्वी जबाबदारी कुसबे ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी श्री. संतोष हरिश्चंद्र तानावडे यांनी पार पाडली. याकामी त्यांना श्री. नितीन महाडेश्वर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

पारिजात संस्थेच्या हेतूपूर्तीसाठी शाळेच्या आवारात सुपारी ( पोफळ ) रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. तर, सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका रोपाचे वाटप करून, आपल्या घरी वृक्षारोपण करण्यास सांगून, संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले

याच कार्यकमाचे औचित्य साधून श्रीम. तेजश्री भगवान घाडीगांवकर यांच्यावतीने विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून, पालक व ग्राम विकास मंडळ यांच्या समन्वयातून शाळेची भरभराट लवकरच होऊन, शाळेतून गुणवान विद्यार्थी निचितच घडतील असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब हरमलकर यांनी, सूत्रसंचालन वैशाली साठे यांनी तर आभार श्री. गजेंद्र राणे यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.