जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रत्नागिरीत चैतन्यदायी शोभायात्रा

मंत्री ना.उदय सामंत यांच्या शुभेच्छा

रत्नागिरी  : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आज हिंदू नववर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. लोकांचा सळसळता उत्साह, वाद्यांचा दणदणाट, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, ध्वजधारी स्त्रीपुरूष व शिस्त अशा थाटात निघालेल्या या चैतन्यदायी शोभायात्रेने रत्नागिरीकरांची सकाळ आनंददायी केली. उद्यागमंत्री उदय सामंत यांनी या शोभायात्रेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीसह महाराष्ट्रात ४५ शहरांत अशा शोभायात्रा काढण्यात आल्या. त्याशिवाय गोवा, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश छत्तीसगड, कर्नाटक या राज्यातही अशा शोभायात्रा आज काढण्यात आल्या. एकूण ६२ शोभायात्रा काढण्यात आल्या. मराठी नववर्षाची सुरुवात होणारा हिंदूंचा हा महत्वाचा सण. त्यामुळे सर्वत्र हा सण उत्साहात साजरा झाला. त्यात जिल्हाभरातून आलेले स्वस्वरूप संप्रदायाचे लोक, नागरिक मोठ्यासंखेने व नटूनथटून सहभागी झाले होते.

रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे आज सकाळी सहापासूनच गजबजू लागला होता. जिल्हाभरातून लोक मिळेल त्या वाहनाने येत होते. सर्वत्र उत्साह संचारला होता.

सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यात घडत होते. त्यात अनेक चित्ररूप व सजीव देखावे होते. त्यात समाजप्रबोधन करणारे, वैभवशाली इतिहासाला उजाळा देणारे, संतांची थोर परंपरा दाखवणारे देखावे होते. तसेच ढोल पथक, भजन, वाद्यवृंद सहभागी होता. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा मोठी गर्दी होती. नऊनंतर थोडाफार उन्हाचा तडाखा जाणवत होता. वाटेत मिरवणुकीतील लोकांसाठी समाजसेवी संस्थाननी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

शहरातील शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी श्रीराम मंदिर इथे आले. तिथे पूजा, आरती झाली. रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका व श्रीराम मंदिर अध्यक्षा सौ. उर्मिला ताई घोसाळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. सर्वांना अल्पोपहार देण्यात आला व शोभायात्रेची सांगता झाली. यात्रेत जिल्हा व तालुक्यातील संप्रदायाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

*उदय सामंत यांच्या शुभेच्छा*

मध्यंतरी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शोभायात्रेची पाहणी केली. त्यांनी रत्नागिरीत सातत्याने शोभायात्रेचा उपक्रम राबविला जात असल्याबद्दल संस्थानचे कौतुक केले. सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.