खेड (प्रतिनिधी) – एकेकाळी मनसेचा मजबूत किल्ला मानल्या जाणाऱ्या खेड नगरपरिषदेत या वर्षीच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा पूर्णत: शून्य सहभाग दिसून येत आहे. सलग तीन कार्यकाळ मनसेच्या ताब्यात राहिलेल्या या नगरपरिषदेत कुंदन सातपुते (उपनगराध्यक्ष), गौरी पुणेकर, उर्मिला शेटे-पाटणे आणि वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची पकड अप्रतिम भासली होती. मनसेचा प्रभाव खेडमध्ये इतका व्यापक होता की सत्तेची समीकरणे जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, या निवडणुकीत मनसेकडून एकही अधिकृत उमेदवार मैदानात नसणे हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, मनसेचे विद्यमान शहराध्यक्ष स्वतः मशाल या स्वतंत्र चिन्हावरून प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत आहेत, आणि त्यांच्या पत्नी देखील याच चिन्हावरून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवत आहेत. यामुळे खेडमधील मनसेची अधिकृत संघटना पूर्णत: निष्क्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे.
ही परिस्थिती मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या पक्षातून झालेल्या बडतर्फीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिणामाची थेट साक्ष देते. त्यावेळी काहींनी “वैभव खेडेकर म्हणजे मनसे नाही, कोकणातील मनसे त्यांच्यावर अवलंबून नाही” असे दावे केले होते. परंतु, आजच्या घडीला मनसे एकही उमेदवार उभा करू शकत नसल्याने हे सर्व दावे पोकळ ठरल्याचे दिसून येत आहे. खेडमध्ये मनसेचे कार्यकर्ते, स्थानिक संघटन आणि जनाधार मोठ्या प्रमाणात वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाशी जोडलेले होते, हे आता स्पष्टपणे पटल आहे. खेडेकर यांची अनुपस्थिती आणि त्यानंतर पक्षाची झालेली पडझड यामुळे मनसेची पूर्वीची पकड संपूर्णपणे ढासळली आहे. मनसेविना होणारी ही निवडणूक खेड नगरपरिषदेसाठी मोठा राजकीय टप्पा मानली जात असून, यानंतर खेडमधील राजकारणाची दिशा आणि भविष्यातील समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











