मुर्शिदाबाद: पंचायत निवडणुकीदरम्यान (Panchayat Elections) पश्चिम बंगालमध्येल (West Bengal) प्रचंड हिंसाचार सुरू आहे. राज्यभरात तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या बातम्या येत आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजता पंचायत निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर मध्यरात्रीपासून झालेल्या मतदानाशी संबंधित हिंसाचारात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच टीएमसी (TMC) आणि दोन भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय स्वतंत्र पक्षाच्या समर्थकांचाही हिंसाचारात मृत्यू झाला आहे.
राज्यात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही भीषण हिंसाचार होत आहे. पूर्व मेदिनीपूरच्या नंदीग्राम ब्लॉक १ च्या रहिवाशांनी टीएमसीवर बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. महमदपूरच्या बूथ क्रमांक ६७ आणि ६८ मध्ये केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात यावा, त्याशिवाय मतदान करणार नाही असे लोकांचे म्हणणे आहे.
मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात झालेल्या संघर्षात सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बाबर अली ठार झाला असून गोळी लागल्याने काँग्रेस कार्यकर्ता रुग्णालयात दाखल आहे. कूचबिहारमधील मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली असून मतदान सुरू होताच मतपत्रिका लुटण्यात आल्या आहेत. डायमंड हार्बरवरूनही अशाच बातम्या येत आहेत.
मालदा येथील माणिकचक आणि गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या जिशार्द टोलमध्ये जोरदार गोळीबार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शेख मलेक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हुगळीत टीएमसी कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारावर गोळ्या झाडल्याचं वृत्त आहे.