गुहागर | प्रतिनिधी
तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळी येथून विविध भागांमधील घरांमधून गॅस सिलेंडर चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत तालुक्यातील सात घरांमधून गॅस सिलेंडर चोरीला गेले असून, ही साधी चोरी नसून पूर्वनियोजित टोळी सक्रिय असल्याचे संकेत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गॅस सिलेंडरचा तुटवडा, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती यामुळे सिलेंडरची काळ्या बाजारात मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी नव्या पद्धतीने चोरीची पद्धत स्वीकारली आहे.
माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर, पडवीत किंवा स्वयंपाकघराच्या मागील बाजूस ठेवलेले सिलेंडर चोरी केले आहेत. काही घरांमध्ये रिकामा किंवा भरलेला सिलेंडर यातील फरक न करता, हाताशी लागलेला सिलेंडर उचलल्याचे लोकांनी सांगितले.
गुहागर तालुक्यातील जानवळे (ओझरवाडी) येथील प्रकाश पाटिल यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यांच्याकडे एच.पी. गॅसचे दोन सिलेंडर आहेत. ३० मार्च रोजी त्यांनी नवीन सिलेंडरची नोंदणी केली आणि ३ एप्रिल रोजी ‘चंद्रभागा गॅस एजन्सी’मार्फत घरपोच सिलेंडर प्राप्त झाला.
सिलेंडर त्यांनी घराच्या पाठीमागील अंगणात चुलीजवळ ठेवला होता. मात्र, ४ एप्रिल रोजी सकाळी ते पाहण्यासाठी गेले असता सिलेंडर गायब आढळला. घरातील किंवा शेजाऱ्यांनी सिलेंडर घेतल्याचा संशय नाकारल्यामुळे ही चोरी असल्याचे निश्चित झाले.
३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास ‘चंद्रभागा गॅस एजन्सी’मार्फत त्यांना घरपोच सिलेंडर प्राप्त झाला. पाटिल यांनी तो नवीन सिलेंडर घराच्या पाठीमागील अंगणात चुलीजवळ ठेवला होता. मात्र, ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता जेव्हा ते अंगणात गेले, तेव्हा त्यांना सिलेंडर त्या ठिकाणी दिसून आला नाही.
सिलेंडर जागेवर नसल्याचे लक्षात येताच पाटिल यांनी सुरुवातीला घरातील व्यक्तींनी किंवा शेजाऱ्यांनी तो वापरासाठी नेला असावा, या समजुतीने विचारपूस केली. मात्र, सर्वांनी त्याबाबत असमर्थता दर्शवली. परिसरात शोध घेऊनही सिलेंडर मिळून न आल्याने,अज्ञात इसमाने तो चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली.पाटिल यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरु केला आहे.
याबाबत गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही घटना फक्त आर्थिक नफा साधण्यापुरती मर्यादित नसून सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करते. घरातील जीवनावश्यक वस्तू देखील चोरीस सुरवात झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.












