वेंगुर्ला | प्रतिनिधी : वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वडखोल भागातील काही नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत शिवसेना पक्षाचे वेंगुर्ल शहर प्रमुख उमेश येरम यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या सुचनेनुसार मुख्याधिका-यांनी तेथील वस्तुस्थितीची पहाणी केली. तेथील समस्या जाणून घेऊन प्राप्त झालेल्या निधीनुसार तेथील कामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून वडखोल वासियांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
वडखोल येथील नागरिकांनी निशाण तलावामधून वाहून जाणारे ज्यादा पाणी नाल्यातून पुढे जावून समुद्राला जाते. निशाण तलावाची उंची वाढविणेच्या पूर्वी सदरचे पाणी पाटाद्वारे येथील नारळाच्या बागायतीसाठी वापरण्यात येत होते. परंतु तलावाची उंची वाढविताना सदरचे पाट खराब झालेले असल्याने बागायतीसाठी पाणी मिळत नाही. यावर मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी या ठिकाणी कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा घालून पाणी साठवून उरलेले पाणी नाल्यात न सोडता येथील शेतकरी यांचे असलेल्या पाटाला सोडण्यासाठीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. निधी मंजूर झालेनंतर काम करता येवू शकणारे आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लवकरात लवकरच निधी मिळवून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वेंगुर्ल शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. तदनंतर ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी वडखोल येथील ग्रामस्थ प्रभाकर पडते, उत्तम परब, चंद्रकांत परब, रवी परब, आनंद परब, अनंत परब, बाबू कोळेकर, निवृत्ती आरमारकर, राजेंद्र पालव व इतर नागरिक उपस्थित होते.












