देवळे ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. श्री. विलास चाळके यांचा सत्कार; गावातील पाणीटंचाई दूर करण्याचे दिले आश्वासन

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील देवळे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष श्री. विलास चाळके यांची नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या भेटीदरम्यान देवळे गावातील ज्वलंत प्रश्न आणि विशेषतः पाणीटंचाईच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लक्ष घालावे, अशी आग्रही विनंती मंडळाच्या कार्यकारिणीने मा. श्री. विलास चाळके यांना केली. यावर त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, “देवळे गावातील पाणीटंचाईसह सर्व समस्या सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून कटिबद्ध राहीन आणि त्या दूर करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

या सदिच्छा भेटीच्या वेळी देवळे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय काळोखे, उपाध्यक्ष श्री. विश्वास घाग, कार्याध्यक्ष श्री. राकेश गुरव, खजिनदार श्री. रविंद्र पांचाळ, उपसचिव श्री. प्रदीप शिंदे, सदस्य श्री. अनिल साळवी, श्री. विष्णू पांचाळ, श्रीमती रेश्माताई परशेट्ये, शिवसेना युवा नेते श्री. प्रसाद आपंडकर, श्री. अजय कदम, श्री. मंगेश कदम, श्री. संतोष कदम, श्रीमती सविता लाखाटे तसेच कुमार ऋत्विक देवरुखकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेनंतर चहापानाचा आस्वाद घेत श्री. विलास चाळके यांच्या भावी वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या सदिच्छा भेटीची सांगता करण्यात आली, अशी माहिती देवळे ग्रामविकास मंडळ मुंबईचे सचिव ॲड. नीलेश सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.