जिल्हा प्रशासन, वन विभाग, तटरक्षक दलासह गणपतीपुळे ग्रामस्थांचे सांघिक प्रयत्न
रत्नागिरी | अनघा निकम मगदूम : प्राण वाचवण् हे पुण्याचं काम… गणपतीपुळे येथे वाळूत अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचे जीव वाचवण्यासाठी पुण्यापासून संपूर्ण प्रशासन, वन विभाग, तटरक्षक दल आणि गणपतीपुळे येथील ग्रामस्थांनी तब्बल 36 तासाहून अधिक काळ प्रयत्नांची पराकष्ठा केली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे 30 फूट लांब व्हेलचे पिल्लू मंगळवारी रात्री सुखरूप समुद्रात परतले आणि सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले.
सोमवारी सकाळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर भलमोठा व्हेल मासा आढळून आला होता. तो जीवंत होता आणि लाटांच्या भरती ओहोटीच्या खेळात तो या किनाऱ्यावर वाळूत अडकला होता. याची माहिती मिळताच गणपतीपुळे येथील ग्रामस्थांसह वन विभागाने किनारपट्टीवर धाव घेतली आणि या जीवंत माशाला पुन्हा समुद्रात पाठवण्याचे व्हेल मिशन सुरु आहे.
समुद्र किनाऱ्यावर अडकलेला हा मासा म्हणजे व्हेलचे अडीच ते तीन महिन्यांचे पिल्लू होते. तरीही त्याची लांबी 30 फूट आणि वजन अडीच ते तीन टन इतके होते. सुरुवातीला भरतीचे पाणी किनाऱ्यावर आले की मासा पुन्हा समुद्रात जाईल ही शक्यता खोट ठरली. वाळूत अडकलेल्या व्हेल माशाला बाहेर काढून समुद्रात ढकलण्यासाठी 2 जेसीबी मागवण्यात आले. त्याला उचलून समुद्रात टाकण्यासाठी तटरक्षक दालाने आपले हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते.
मात्र या सगळ्याचा काहीच उपयोग होतं नव्हता. त्याला खड्ड्यातून बाहेर काढुनही ते पाण्यात पोहण्याएवढी कदाचित त्याच्याकडे ताकद नव्हती.
जिलाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी आणि गणपतीपुळे येथील अनेक जागरूक नागरिक घरात दिवाळी असूनही या पिल्लाला जीवदान मिळावे यासाठी सतत प्रयत्न करत होते. शेवटी वन विभागाने पुण्याहून त्यांची रेस्क्यू टीम बोलावली. दरम्यान या पिल्लाची पशु वैद्यकडून तपासणी करून त्याला औषध सुद्धा देण्यात आले होते. अखेरीस सर्वांच्या सांघिक प्रयत्नानी मंगळवारी रात्री व्हेल चे ते पिल्लू सुखरूप त्याचा परतीच्या प्रवासासाठी समुद्राकडे निघाले आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला शुभेच्छा दिल्या. आणि सर्वांनी मंगलमूर्तीचे आभार मानले.
ऐन दिवाळीत घरातील सण विसरून एका माशाच्चा पिल्लासाठी प्रयत्न करणारया प्रशासन आणि ग्रामस्थांचे सर्वांचेच सर्वत्र कौतुक होतं आहे.